म्युकरमायकोसिस काय आहे?

 

म्युकरमायकोसिस' हा बुरशीजन्य रोग सध्या करोनाबरोबर त्रास देत असला, तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. सार्वजनिक स्वच्छता पाळणं, ही जनतेची आणि सरकारची सामूहिक बांधिलकी हवी. त्यातून बुरशीचा फैलाव थांबू शकतो.





या आजाराची चर्चा अलीकडे सतत होत आहे. काय आहे तो? वातावरणात असलेल्या जिवाणू, विषाणू आणि बुरशी (फंगस) या सूक्ष्म जंतूंमुळे माणसाला विविध आजार होतात. 'म्युकरमायकोसिस' हा बुरशीजन्य आजार आहे आणि तो करोनाची लाट येण्यापूर्वीपासूनच आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असणं, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर वाढणं आणि अतिमात्रेची 'स्टिरॉइड्स' दीर्घकाळ घेणं, या तीन महत्त्वाच्या कारणांमुळे 'म्युकर' बुरशीचा संसर्ग होऊन, 'म्युकरमायकोसिस' होतो. कॅन्सरग्रस्त, मूत्रपिंड किंवा इतर अवयवांचं प्रत्यारोपण झालेल्या; तसंच डायलिसिसवर असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्यानं, 'म्युकर'चा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.

कुठल्याही बुरशीचं वास्तव्य हे प्रामुख्यानं जमिनीत असतं. कुजलेल्या आणि दमट हवेत पडून राहिलेल्या वस्तूंवर बुरशी वाढते. शहरं किंवा गावांतील असंख्य उकिरड्यांमध्ये या बुरशीचं वास्तव्य असतं. 'म्युकरमायसेटीस' या समूहातील विविध बुरशींचा (ज्यात 'म्युकर'चाही समावेश आहे) माणसाला संसर्ग झाला, की त्याला 'म्युकरमायकोसिस' हा आजार होतो. हा संसर्ग शरीराच्या कुठल्या भागाला झाला आहे, त्यावरून आजाराची लक्षणं दिसतात. सायनस आणि डोळ्याच्या भागात संसर्ग झाला, तर नाक सतत वाहतं राहणं, नाक चोंदणं, डोळ्यांतून पाणी येणं, चेहरा सुजणं, डोळा लाल होणं, ताप येणं, डोकं दुखणं, डोळ्यांना दोन प्रतिमा दिसणं अशी लक्षणं दिसतात.

या बुरशीचा संसर्ग फुफ्फुसांना झाला, तर छातीत दुखणं, खोकला येणं, ताप येणं अणि श्‍वास घ्यायला त्रास होणं, थुंकीतून रक्त पडणं, धाप लागणं ही लक्षणं असतात. त्वचेला झालेल्या जखमेतूनही बुरशीचा संसर्ग होतो. अशी बुरशी शरीराच्या ज्या भागात शिरकाव करते, त्या भागातल्या अवयवांवर हल्ला करून त्यांचं काम बंद पाडते. या आजाराचं निदान रुग्णाची रक्त तपासणी, 'एमआरआय' आणि 'सीटी स्कॅन' यांच्या रिपोर्टवरून करता येतं.

Corona रुग्णाची प्रतिकारशक्ती खूप खालावते. कोव्हिड-१९ विषाणूनं फुफ्फुसांवर हल्ला केला असेल, तर अनेकदा स्टिरॉइड द्यावी लागतात. त्यामुळे प्राण वाचले, तरी या औषधाचे घातक परिणाम होतातच. महत्त्वाचं म्हणजे, स्टिरॉइडमुळे प्रतिकारशक्ती आणखी खालावते; तसंच रक्तशर्करा खूप वाढते. मधुमेह असो किंवा नसो, हा परिणाम होतोच. मधुमेह्याच्या शरीरात बुरशी शिरली, की तिला रक्तशर्करा अन्न म्हणून मिळते. मग ही बुरशी झपाट्यानं वाढते. प्रत्येक करोना रुग्णाला 'म्युकर' होईलच असं नाही. मधुमेह नसणाऱ्या व स्टिरॉइड न घेणाऱ्यांना धोका कमी असतो.
ही बुरशी प्रथम नाकावाटे जाते आणि तिथून सायनसमध्ये वाढते. तिथून ती डोळ्यात आणि मेंदूत शिरते. या बुरशीचा संसर्ग कर्कपेशींपेक्षा जलद होतो. कर्करोगात पेशींची अनियंत्रित वाढ होण्यासाठी किमान काही महिने तरी जातात; पण 'म्युकर'चा संसर्ग झाल्यानंतर काही दिवसांतच झपाट्यानं ही बुरशी फुफ्फुस, डोळे, मेंदू, जबडा यांपैकी कुठल्या तरी अवयवांवर हल्ला करते. रुग्णाच्या कपाळाखाली किंवा तोंडात टाळ्याच्या जागी काळे व्रण दिसणं, हे या आजाराचं गंभीर लक्षण मानलं जातं. करोना येण्याआधी तीन-चार वर्षांतून 'म्युकर' झालेला एखादाच रुग्ण दिसे. आता त्याचे बरेच रुग्ण आढळत आहेत.

करोना रुग्णांच्या रक्तातील oxygen विशिष्ट पातळीखाली आला, की त्यांना 'व्हेंटिलेटर'नं प्राणवायू देतात. यासाठी ऑक्सिजन सिलिंडर किंवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरतात. सिलिंडरमध्ये प्रचंड दाबाखाली द्रवरूप ऑक्सिजन असतो. या सिलिंडरमधील ऑक्सिजन नियंत्रित पद्धतीनं पाण्यानं भरलेल्या बाटलीतून पाठवून रुग्णाला दिला जातो. याचं कारण नाकामध्ये ज्या अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या (केशनलिका) असतात, त्या कोरड्या हवेमुळे फुटून नाकातून रक्त येऊ शकतं. म्हणूनच, पाण्याच्या बाटलीमधून (ह्युमिडीफायर) बाहेर आलेला बाष्पमिश्रित ऑक्सिजन द्यावा लागतो.


ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे उपकरण हवा खेचून घेतं. हवेत ७८ टक्के नायट्रोजन, २१ टक्के ऑक्सिजन आणि एक टक्का इतर वायू असतात. नायट्रोजन आणि इतर वायू दूर करून, हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण २१वरून ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत नेण्याचं काम हे उपकरण करतं. ही हवा रुग्णाला श्‍वसनासाठी दिली जाते; त्यामुळे त्याच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विजेवर चालतो; त्यामुळे वीजपुरवठा असेपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा अखंड सुरू राहतो.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे उपकरण; तसंच त्याला जोडलेली प्राणवायूवाहक नळी निर्जंतुक नसेल, तर तीत बुरशी वाढते. या उपकरणात वापरल्या जाणाऱ्या बाटल्यांमधून 'डिस्टिल्ड वॉटर'ऐवजी साधं पाणी वापरलं, तर त्यातूनही बुरशी शिरू शकते. या तीनपैकी एका किंवा अधिक कारणांमुळे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. अर्थात, असंच प्रत्यक्षात घडत असेल, असा दावा करण्याचा हेतू नाही; पण निष्काळजी किंवा नजरचुकीमुळे ही चूक होत असेल, तर काळजी घेणं आवश्यक आहे. एका जागेवरून दुसरीकडे सहजपणे हलवता येणारे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आता उपलब्ध आहेत.

म्युकर'च्या आजाराची शंका असलेल्या राज्याच्या विविध भागांतील रुग्णांना तुलनेनं मोठ्या शहरातील रुग्णालयात नेईपर्यंत दिरंगाई झाल्यास, आजाराची तीव्रता खूप वाढू शकते. निदान लवकर होऊन उपचार वेळेवर मिळाले, तर आजार बरा होऊ शकतो; पण बरेच रुग्ण या बुरशीचा संसर्ग झाल्यानंतर आठ-दहा दिवसांनी डॉक्टरांकडे येतात. तोपर्यंत म्युकर बुरशीनं सायनस, डोळा आणि मेंदू यापैकी कुठल्या तरी भागात प्रवेश मिळवलेला असतो. या बुरशीनं मेंदूवर हल्ला केला असल्यास, अशा रुग्णाला वाचवणं कठीण होतं. काही वेळा औषधानं बुरशीचा संसर्ग आटोक्यात येण्यासारखा नसला, तर रुग्णाचा डोळा किंवा जबडाही काढावा लागतो.

'म्युकर' बुरशीचा संसर्ग शरीराच्या ज्या भागात होतो, त्या भागातल्या केशनलिका ही बुरशी निकामी करते. म्हणजेच, केशनलिका बंद पाडते. बुरशीच्या संसर्गानं बंद पडलेल्या केशनलिकांमुळे तिथल्या पेशी मृत पावतात. बुरशीमुळे झालेला हा आजार बरा करण्यासाठी 'अॅम्फोटेरिसिन' हे 'अँटिफंगल' औषध इंजेक्शनद्वारे द्यावं लागतं. केशनलिका जर बंद झाल्या, तर हे औषध रुग्णाच्या बाधित अवयवापर्यंत पोहोचत नाही; त्यामुळे त्या औषधाचा अपेक्षित परिणाम होत नाही. अशा वेळी हा अवयव काढून टाकण्याशिवाय दुसरा मार्ग उरत नाही. हे चित्र भयावह असलं, तरी योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आजार बरा होण्याची शक्यता वाढते. ही अँटिफंगल इंजेक्शन आणि काही आठवडे चालणारा एकूण उपचारांचा खर्च लाखांच्या घरात असल्यानं, हा खर्च सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा असतो.
म्युकरमायकोसिस' आणि इतर अनेक रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक स्वच्छतेला खूप महत्त्व दिलं पाहिजे. किंबहुना, सार्वजनिक स्वच्छता पाळणं, ही जनतेची आणि सरकारची सामूहिक बांधिलकी असली पाहिजे. त्यातून बुरशीचा फैलाव थांबवण्यास नक्कीच मदत होईल.

Technical education 01.blogspot.com


Thank you for reading this blog..

Comments